बजेट तयार करणाऱ्या टीमची अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतरच सुटका
नवी दिल्ली – कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या पार्श्वभूमीवर आज मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्र्यांच्या भाषणाआधी हा अर्थसंकल्प बाहेर येऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात येते. त्यासाठी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला काही दिवस अर्थमंत्रालयातच, कोणाच्याही संपर्कात न येता राहावे लागते. आजच्या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला गेल्यानंतर या टीमची सुटका होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या छपाईला ‘हलवा सेरेमनी’नंतर सुरुवात करण्यात येते. त्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात येते आणि या टीमला कोणाच्याही संपर्कात न येता पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सर्व सोय अर्थमंत्रालयाकडून दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे केली जाते. आत काम करताना या लोकांचे मोबाईल अथवा इतर सर्व गोष्टी जमा करुन घेण्यात येतात. तसेच आतील सर्व संगणकांचा सर्व्हरशी येणारा संपर्कही तोडण्यात येतो. त्यानंतर अर्थसंकल्प तयार करणे आणि त्याची छपाई करणे ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त पद्धतीने करण्यात येते. ज्यावेळी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळी या टीमला बाहेर काढले जाते. मुख्य म्हणजे यंदा कोरोनामुळे अर्थसंकल्पाची छपाई न करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात असून खासदारांना बजेटसंबंधी कागदपत्रे ही डिजिटल स्वरुपात देण्यात येणार आहेत.