‘बकरी ईद’ घरीच साजरी करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन
राज्यात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.त्यामुळे आता आगामी येणाऱ्या सणांवर याची गदा येणार आहे. जसं की लवकरच आता गणेशोत्सव येाणार आहे. पण यंदा याच कोरोनाच्या सावटामुळे भक्तांना आपल्या बाप्पाचा उत्सव अगदीच साध्या पद्धतीने करावा लागणार आहे. सरकारने काही नियम-अटींसह गणेशोत्सव साजरा करण्याला परवानगी दिली आहे.मात्र आता याच मुद्द्यावरून याच महिन्यात 30 तारखेला येणारी बकरी- ईद च काय? हा प्रश्न मुस्लीम बांधवांना पडला आहे. सण साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर राज्यसरकारने निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद साजरी करण्याला परवानगी दिली असून ती घरीच साजरी करा, असं आवाहनही केलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बकरी ईद संदर्भात बैठक घेतली. अनेक लोकप्रतिनिधींनी ईद साजरी करण्यासाठीच्या काळात मटण उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटण विक्रीस प्राधान्य द्यावं. मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन”, असंही ठाकरे म्हणाले.
तत्पूर्वी, ‘बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. हा सण जवळ आल्यानंतरही सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाज आणि संघटनांमध्ये अस्वस्थता आहे,’ असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. ‘सरकारने काही अटी शर्थीच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदलाही परवानगी दिली जावी, तसेच कुर्बानीतून सूट दिली जावी,’ असे खान यांनी म्हटले आहे.