बँक घोटाळ्यातील व्यापारी-उद्योजकांची नावे जाहीर करा!
- पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई : रिझव्र्ह बँकेच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळे सातपटीने वाढले असून पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातही ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये संकटात आले आहेत. घोटाळेबाजांचे सरकारमधील उच्चपदस्थांशी संबंध असून या घोटाळेबाजांची नावे सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. राज्यातील फडणवीस सरकारचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कलम ३७० चा बोलबाला करीत असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही निवडणूक राज्यातील फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारी आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी राज्यासाठी काय केले याचा हिशोब जनतेला द्यायला हवा. या सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी आणि मतदारांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी मोदी-शहा आणि मुख्यमंत्रीही मूळ प्रश्नांना बगल देत कलम ३७० आणि काश्मीरबाबत बोलून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना केला.