फोन टॅप होताहेत हे माहिती होते पण…, शरद पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई | फोन टॅपिंग होत होते हे आम्हाला माहिती होते. पण आम्ही ते फारसे गांभीर्याने घेतले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. राज्यात गेल्या सरकारच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे.
या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, फोन टॅप होतात हे आम्हाला माहिती होते. पण आम्ही ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. या संदर्भात आदेश काढण्याचे अधिकार संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला असतात. राज्यमंत्र्याला ते अधिकार नसतात. त्यामुळे गेल्या सरकारमधील राज्यमंत्र्यांना याबद्दल किती माहिती आहे हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या सरकारमधील गृहखात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी हे विधान केले.