प्रेमसंबंधातून नवविवाहित तरुणाचा खून झाल्याचा संशय ; एकजण निगडीतून ताब्यात
पिंपरी – औंध येथील नवविवाहित तरुणाचा पुणे-महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात निर्घृण खून करण्यात आला. याबाबत सुरुवातीला हा खून लुटण्याच्या बहाण्याने करण्यात आल्याचे समजले. मात्र हा खून लुटण्याच्या नाही तर प्रेमसंबंधातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला वाई पोलिसांनी निगडीतून ताब्यात घेतले आहे.
निखिल मळेकर (रा. ओटास्किम, निगडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पसरणी घाटात तरुणाचा खून झाला. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी वाई पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून वाई पोलिसांचे एक पथक पुण्याच्या दिशेने रविवारी सकाळी रवाना झाले. निगडी मधील ओटास्कीम भागातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक विनय वेताळ तपास करीत आहेत.
दरम्यान, आनंद कांबळे याचा 26 मे रोजी दीक्षा या तरुणीची विवाह झाला. त्यानिमित्त आनंद आणि दीक्षा शनिवारी (दि. 2) महाबळेश्वरला जात होते. यावेळी आनंद याचा मित्र राजेश आणि त्याची पत्नी कल्याणी बोबडे हे दाम्पत्यही महाबळेश्वरच्या ट्रिपला सोबत होते. शनिवारी सकाळी चौघेजण चारचाकी इनोव्हा कार (एम एच 14 / जी एच 7071) मधून पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने जात होते. वाटेत असलेल्या पसरणी घाटात दीक्षाला उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे गाडी थांबवली. आनंद आणि दीक्षा गाडीबाहेर आले असता दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी आनंद वर कोयत्याने वार केले. यामध्ये आनंद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असलयाचे डॉक्टरांनी घोषित केले.