प्रिया प्रकाशला न्यायालयाचा मोठा दिलासा
नवी दिल्ली – इंटरनेट सेन्सेशन ठरलेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रिया प्रकाशविरुद्ध हैद्राबाद आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने तक्रारकर्त्यांना चांगलेच फटकारले असून प्रियाविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्यास सांगितले आहे.
प्रिया प्रकाशच्या आगामी ‘ओरू अदार लव्ह’मधील गाणे ‘मनिक्या मलारया पूवी’ हे १३ फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आले होते. या गाण्याने एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप प्रिया प्रकाशवर ठेवत हैद्राबाद आणि महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. याविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लूलू व प्रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रिया प्रकाशविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले. प्रियाचा आणि दिग्दर्शकाचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
सुनावणीवेळी दिग्दर्शक ओमर लूलू यांनी म्हंटले कि, ‘मनिक्या मलारया पूवी’ हे गाणे लोकगीत असून गेली ४० वर्षे केरळमध्ये गायले जात आहे. अमल्ल्याळम भाषिकांनी या गाण्याचा चुकीचा अर्थ काढत निष्कारण वाद निर्माण केला आहे.