प्रवेशावेळी सादर करावी लागणार कागदपत्रे
- पडताळणीवेळी कागदपत्रे नसणाऱ्यांचा प्रवेशावरील दावा निघून जाणार
पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रीकल्चरच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना यंदापासून प्रवेशफेरीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावी लागणार आहेत. यापूर्वी गुणवत्ता यादीनंतर प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेत असताना कागदपत्रे सादर करावी लागत होती. आता मात्र अर्ज करतानाच ही सर्व कागदपत्रे आवश्यक ठरणार आहेत. प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक राहणार आहे.
इंजिनिअरिंग, फार्मसी व ऍग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी निकालानंतर अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यंदा मात्र अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जवळ जे उपलब्ध कागदपत्रे आहेत, त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्यांजवळ कागदपत्रे नसतील, तर त्या विद्यार्थ्यांचे प्रवेशावरील दावा निघून जाईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
यासंदर्भात रायते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदापासून प्रवेशापूर्वीच अर्ज करताना विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यात दुरुस्तीसाठी अवधी दिला जाईल. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केले जातील. मात्र यादी प्रसिद्ध होताच सर्व विद्यार्थ्यांची जवळच्या सुविधा केंद्रावर कागदपत्रांची तपासणी अथवा पडताळणी केली जाणार आहे. त्यावेळी मूळ कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्याचे पहिल्या यादीनुसार प्रवेश दिला जाणार नाही. मात्र त्या विद्यार्थ्याला खुल्या गटातून दुसऱ्या फेरीत प्रवेश गुणवत्तेनुसार दिले जातील. यंदा मात्र विद्यार्थ्यांना जेवढे उपलब्ध कागदपत्रे असतील, तेवढे सादर करावेत. कागदपत्रांची बनवाबनवी करू नये अन्यथा प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.