प्रदूषित वातावरणात आज भारत-बांगलादेश सामना
- भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका
राजधानीत प्रदूषित हवामानामुळे ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर झाली आहे. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताची ‘पर्याय शोधमोहीम’ सुरू असून, युवा खेळाडू संधीचे सोने करण्यासाठी, तर अनुभवी खेळाडू स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दिवाळीनंतरच्या प्रदूषणपर्वाचा सामना करणाऱ्या दिल्लीतील सामन्यासंदर्भात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. पाहुण्या बांगलादेश संघानेही याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.
प्रभारी संघनायक रोहित शर्मा सातत्याने धावांचा वर्षांव करीत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीप्रमाणेच ट्वेन्टी-२० मालिकेतही तो प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी भारताला जवळपास २० सामने खेळायचे असून, याद्वारे समतोल संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. या पाश्र्वभूमीवर अनेक पर्याय हाताळणे महत्त्वाचे ठरेल.