प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण
मुंबई – टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाला आहे.
वाचा :-लोखंडवालामध्ये NCBचा छापा, अडीच कोटींची मलाना क्रिम व 14 लाखांची रोख रक्कम जप्त
दरम्यान, ईडीने मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावे लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळविले होते.