प्रचारानिमित्त शरद पवार आणि प्रियांका गांधी येणार एकाच व्यासपीठावर
मुंबई | महाईन्यूज |
काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी अशा दोन पक्षांच्या दोन दिग्गज नेत्यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियांका गांधी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका रॅलीमध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. परंतु, राहुल गांधी यांचं महाराष्ट्राला दर्शन घडण्याची शक्यता धूसर दिसते.
राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारावर काहीसे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. नेत्यांमध्ये दुफळी माजल्यामुळे राहुल गांधी यांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह, कालिदास कोळंबकर यासारख्या नेत्यांनी नजीकच्या काळात पक्षाची साथ सोडली. एकीकडे काँग्रेसला लागलेली गळती आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षांतील मेगाभरतीमुळे विधानसभेला राहुल गांधींच्या रुपाने ‘ट्रम्प कार्ड’ पडणं अपेक्षित होतं.
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून झालेला पराभव जिव्हारी लागलेले राहुल गांधी या निवडणुकीपासून विजनवासात गेले होते. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस आपली हुकूमाची पानं बाहेर काढण्याची शक्यता होती, मात्र राहुल गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा करिष्मा किती चालणार, ही वेळीच सांगेल.