पुण्यात ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन
पुणे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रस्ता रोको करण्यात आला. जवळपास दीड तास रस्ता रोखून धरत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासह या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, किरण भालेराव यांच्यासह सर्व मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “अंबरनाथ येथे आठवले साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय असून, त्याचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आठवले साहेब सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळेच आठवले साहेबांवर हल्ला झाला आहे. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच आठवले साहेबांना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत हयगय करू नये. लोकनेता असलेल्या आठवले साहेबांवरील हल्ल्याचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांततेच्या मार्गाने आपापल्या प्रभागात निषेध व्यक्त करावा.”
अनेक मान्यवरांनी आठवले साहेबांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन समाप्त झाले.