पुण्यातील न्यू कल्याणीनगर येथे खाद्य दुकानांसमोर नागरिकांना सोशल डिस्टन्सचे गांभीर्य नाही…
पुण्यातील न्यू कल्याणीनगर येथे खाद्य दुकानांसमोर नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजवलेले चित्र पहायला मिळत आहे. या दुकानांच्या बाहेर मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी पहायला मिळते. व्यवसायिकांना दुकाने सुरु करताना नियम व अटी घालण्यात आल्या होत्या पण त्याचे पालन होत नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून सदर ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मार्च महिन्यापासून खाद्यपदार्थांची दुकान बंद असल्याने व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत होतं. यासाठी शासनाकडून व्यवसायिकांना काही नियम व अटी घालून दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चहा, वडापाव, ज्युस, नूडल्स इतर खाद्य पदार्थावर ताव मारण्यासाठी या ठिकाणी लोकं मोठया प्रमाणात गर्दी करत आहेत.
खाद्य दुकानासमोर नागरिक खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. खाद्य पदार्थं खरेदी करून घोळक्याने उभे राहणे गप्पांची मैफिल रंगवत वडापाव चहावर आणि इतर पदार्थावर ताव मारत राहणे, पायरीवर गप्पा मारत बसणे असे प्रकार या ठिकाणी सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विक्रेते व ग्राहकांकडून नियमांचा पुरता बोजवारा उडालेला आहे.
यांसारख्या घटनांचा परिणाम म्हणून अखेर पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड मध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. दररोज अशा अनेक खाण्याच्या ठिकाणी खवव्ये एकत्रित येऊन दुकानासमोर उभे राहुन गर्दी करतात. खरं तर पार्सल घेऊन घरी जाणे हे दुकानदार व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे पण नागरिक विनाकारण गर्दी करून स्वतः बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालत आहे.