पुणे – सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे नियोजन कोलमडले
- -पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बसेस उशीराने
पुणे – मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा एसटी वाहतुकीवर परिणाम होत आहे. पाऊस, वाहतूक कोंडीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल दीड ते दोन तास उशीराने या मार्गावरील गाड्या धावत असल्याचे दिसून आले. यामुळे आगारात बसेसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वेळापत्रक सोमवार आणि मंगळवारी (दि.10 ) सलग दुसऱ्या दिवशी कोलमडले. मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतून पुण्यात दाखल होणाऱ्या एसटी बसेस रस्त्यावर पाणी साठल्याने मंगळवारी वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. यामुळे मुंबईतून पुण्याच्या स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आगारात दाखल होणाऱ्या एसटी सुमारे एक तास उशिरा पोहोचल्याचे दिसले. पुण्यातून दादर, ठाणे, बोरिवली येथे जाणाऱ्या शिवनेरी तब्बल पाऊण तास उशिराने सुटत होत्या. त्याचप्रमाणे मुंबईत पोहोचण्यासही त्यांना दोन ते अडीच तास जास्त कालावधी लागत असल्याची माहिती मिळाली.
मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढतच असल्याने या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुसळधार पाऊस, मार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे पुणे-मुंबई दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. पुण्याहून मुंबई, ठाणे, दादरला एसटी बसेससह शिवशाही गाड्या सोडल्या जातात. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनहून दादर, बोरिवली, ठाण्याकरिता दर अर्ध्या तासाने शिवनेरीची वातानुकूलित सेवा आहे. तसेच साधी एसटी, हिरकणी आदींची सेवा पुरवली जाते. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे या बसेसला पोहोचण्यासाठी उशीर होत होता. यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.