पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’वर लेनच्या शिस्तीचे उल्लंघन, वाहनचालकांना कारवाईची भिती वाटेना
पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर महामार्ग प्रशासनाकडून वाहतुकीसंदर्भात नियमावली असणारे सूचना फलक लावण्यात आले. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा केला होता. नियमावलीचे फलक लावले तरीही बेशिस्त वाहतूक आणि लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणा-यांची संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. यासाठी वाहतुकीचे नियम कडक करण्याची नितांत आवश्यकता आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजुला वाहतुकीच्या नियमावलीचे फलक नसल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास येत होते. नियम वाहनचालकांना कळावेत आणि त्यानुसार महामार्ग शिस्तीचे पालन केले जावे, याकरिता महामार्गाच्या दोन्ही बाजुला सूचना फलक लावण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश देखील आले असल्याचे त्यांनी स्वतः प्रसिध्दीपत्रक काढून प्रसार माध्यमांना कळविले. महामार्गावरून वाहतूक करणा-या वाहनचालकांना वाहतुकीचे नियम कळाले. परंतु, त्याचे पालन करण्याची शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी वाहतुकीचे नियम आणि कायदा कडक करावा लागणार आहे. यासाठी आमदार जगतापांनी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी समाजातून होत आहे.
महामार्ग प्रशासनाकडून वाहतूक नियमांचे सूचना फलक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुला लावले आहेत. मात्र, नियमांचे पालन वाहनचालकांकडून होताना दिसत नाही. लेनचे गांभिर्य लक्षात घेतले जात नाही. जड वाहने दुस-या लेनमधून धिम्या गतीने धावताना दिसतात. त्यामुळे छोट्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सूचना फलकांमुळे वाहनचालकांना नियमांची जाणिव होत असली, तरी त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची भिती वाटली पाहिजे. त्यासाठी नियम कडक करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी मांडले आहे.