‘पीएमपी’कडून पुणेकरांसाठी फक्त ५ रूपयांत ५ किलोमीटर” प्रवास
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात पीएमपी ही सार्वजनिक वाहतुकीचा कणा असून सर्वसामान्य नागरिक, महिला आणि विद्यार्थी वर्गाच्या प्रवासाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पीएमपीने प्रवास करणारा मोठा वर्ग शहरात अस्तित्वात आहे . या सर्व वर्गासाठी पीएमपीने दसऱ्याच्या मुहूर्तावर खास भेट आणली आहे. या भेटीत नागरिकांना स्वस्त आणि मस्त प्रवासाची संधी मिळणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक परिवहनने ”फक्त ५ रूपयांत ५ किलोमीटर” प्रवास ही नागरिकांसाठी नवी योजना बुधवारी जाहीर केली. दसऱ्यापासून या सेवेला सुरूवात होणार आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ, संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी ऊपस्थित होते. प्रत्येक ५ मिनीटांनी या सेवेत गाड्या ऊपलब्ध होतील असे जगताप यांनी स्पष्ट केले.
अटल प्रवासी योजना म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत प्रवासी नेणारी पूरक प्रवासी योजना आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये एक मध्यभाग निश्चित करून त्याच्या ५ किलोमीटर परिघात वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या जातील. तिथून प्रवासी त्यांना हव्या असलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीने जातील.
पुण्यात महापालिका मुख्य इमारत व पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड हा मध्यभाग असेल. पुणे महापालिकेपासून ५ किलोमीटर परिघात ९ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. फक्त ५ रूपयात इथून कोणत्याही मार्गावर जाता येईल. या सर्व गाड्या मिडी म्हणजे लहान गाड्या आहेत. १८० गाड्या यासाठी वापरण्यात येणार आहे. दर ५ मिनिटांनी नवी गाडी असणार आहे. त्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या काही मार्गांवरील गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात प्रवाशांची अडचण होणार नाही व पीएमपीचे उत्पन्न बुडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे जगताप म्हणाले.
याशिवाय नवे ३७ मार्गही सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांचे अभिप्राय, अपेक्षित उत्पन्न, पीएमपीचे अधिकाऱ्यांचे मत या सगळ्याचा अभ्यास करूनच हे नवे मार्ग ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती जगताप यांनी दिली. दसऱ्यापासून हे नवे मार्ग व अटल प्रवासी योजना सुरू होईल.