पिंपरी चिंचवड शहरात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे ; शहर अभियंत्याचे दुर्लक्ष
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागात पावसाने जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यामुळे डांबरी रस्ते केलेल्या कामांचा दर्जा ढासळल्याचे दिसत आहे. निकृष्ट कामामुळे अनेक रस्त्यावर खड्ड्याची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी रस्त्याची खोदाई सुरु असल्याने सिमेंटचे ब्लॉक, रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिलेचा हकनाक बळी गेला आहे. तरी देखील महापालिका शहर अभियंत्याचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका हद्दीतील शहराच्या चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, दळवीनगर, गांधीपेठ, वाल्हेकरवाडी, भोईरआळी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, जूनी नवी सांगवी, कासारवाडी, भोसरी यासह अनेक सामाविष्ट गावातील रस्त्यावर सध्यस्थितीत वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. महापालिकेने केलेल्या डांबरी रस्त्यावरील काही ठिकाणची खडी वाहून गेलेली आहे. काही त्यावरील डांबरीवर खड्डे पडलेले आहेत. अनेक चाैकात खड्डे पडल्याने ते नागरिकांच्या जिवावर बेतली जावू लागली आहे. पालिकेचे काही भागात चोवीस बाय सातची कामे सुरु आहेत. त्या रस्ते खोदाईने चौकात सर्वत्र सिमेंटचे ब्लॉक उखडले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांना त्याचा त्रास होवू लागला आहे.
तसेच चिंचवडच्या चापेकर चौकातील खड्ड्यांमध्ये आणि सखल भागातही थोड्याशा पावसाने पाणी साचत आहे. त्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही मुश्कील होत आहे. लिंक रस्त्यावर विशाल कॉर्नर अपार्टमेंटलगत सुमारे १५ दिवसांपूर्वी महावितरण कंपनीच्या वतीने खोदकाम केले. परंतु खोदकाम केलेला भाग योग्यरित्या बुजविलेला नाही. सिमेंटचे ब्लॉक व्यवस्थित लावले नाहीत. थेरगावहून चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणाच्या परिसरात खड्डे आहेत. वाल्हेकरवाडीकडून चिंचवड उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावर सखल भागात पावसाचे पाणी साचू लागले आहे. वाल्हेकरवाडीकडून फत्तेचंद शाळेकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावरच रस्ता खचला आहे. वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर संत नामदेव महाराज चौकातही खड्डे आहेत.
दरम्यान, महापालिकेचे शहर अभियंत्याचे शहरातील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडे नगरसेवक तक्रार करायला गेल्यास त्यांनाही उर्मट भाषेत उत्तरे देवू लागले आहेत. त्या अधिका-याशी मागील स्थायी सभेत प्राधिकरणातील नगरसेवक राजू मिसाळ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पहावयास मिळाले होते. तरीही त्या अधिका-यांचा हेकेखोरपणा जात नाही. त्यामुळे संबंधित अधिका-यांच्या हम करेसो कायद्याने शहरातील सर्वसामान्य जनतेचे खड्ड्यात पडून जीव जावू लागले आहेत. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होवू लागली आहे.