पावसाचा अंदाज खोटा ठरला तर हवामानशास्त्र विभागास कुलूप ठोकणार
बीड : हवामान शास्त्र विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. यावेळी असे होऊ नये, विभागाने पावसाचा अचूक अंदाज द्यावा म्हणून भाई गंगांभीषण थावरे यांनी आज पुणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागास या बाबत निवेदन दिले. गतवर्षी प्रमाणे हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरून शेतकऱ्यांना नुकसान झाले तर १५ ऑगस्ट रोजी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरवर्षी हवामान खात्याच्या अंदाजावर हजारो शेतकरी महागामोलाचे बियाणे खरेदी करतात. मात्र पेरणीनंतर पाऊस न पडल्याने सर्व बियाणे जळून खाक होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान मागील वर्षात झाले. यामुळे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात भाई गंगांभीषण थावरे यांनी हवामान खात्याच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचे सबब पुढे करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.