पाथरीचे नामांतर साई धाम करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई – साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद मिटला आहे असे समजत असतानाच आता याबाबत एक वेगळीच मागणी होत आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली होती. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयामुळे शिर्डीकरांचे समाधान झाले आहे त्यामुळे बंद मागे घेत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, आता आमदार मेघना बोर्डीकर यांनी पाथरीचे नामांतर साई धाम करावे अशी मागणी केली आहे.
साई बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरीचे नाव बदलून साई धाम करावे अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे साई जन्मभूमीचा वाद पुन्हा चिघळतो की काय अशी शक्यता निर्माण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई बाबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी विकासनिधी जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा पाथरीकरांनी केला, तर याला शिर्डीकरांनी कठोर विरोध केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शांत झाला होता. आथा पुन्हा जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडत पाथरीचे नामांतर करण्याची मागणी केली आहे.
पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचे आता कागदोपत्री सिद्ध झाले आहे. हे सर्वांना माहिती होण्यासाठी पाथरीचे नामांतर साई धाम असे करावे अशा आशयाचे पत्र मेघना यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. मेघना बोर्डीकर यांच्यासह परभणीतील अनेक नेत्यांचे साईबाबांच्या जन्मभूमीबाबत एकमत झाले आहे. तेव्हा गुरूस्थान सेलू, जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडोर सुरू करण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.