पाच वर्षांत देशातील नक्षली हिंसाचारात ४३ टक्के घट
नवी दिल्ली : नक्षल हिंसाचारात गेल्या पाच वर्षांच्या काळात त्या आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरावर रेड्डी यांनी सांगितले की, सरकारच्या सातत्यपूर्ण उपाययोजना व धोरणांमुळे नक्षलवादी हिंसाचारात घट झाली असून त्यांचे प्रभावक्षेत्रही कमी होत चालले आहे.
सरकारची धोरणे व उपाययोजनांमुळे २०१८ मध्ये केवळ साठ जिल्ह्य़ात नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. यातही साठ जिल्ह्य़ांपैकी केवळ १० जिल्ह्यात हिंसाचाराच्या दोन तृतीयांश घटना झाल्या आहेत. एप्रिल २०१४ ते मे २०१९ दरम्यान हिंसाचाराच्या घटनात आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय धोरण व कृती योजना २०१५ मध्ये मंजूर करून नक्षलवादाचा मुकाबला करण्याचे सरकारने ठरवले होते त्यात सुरक्षा उपाययोजना, स्थानिक समुदायांना अधिकार अशा अनेक उपायांचा समावेश होता.
नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांना सार्वजनिक पायाभूत सुविधा व सेवा पुरवण्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.