देशात दलित, अल्पसंख्याक सुरक्षित
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा दावा
कोलकाता : दलित व अल्पसंख्याक लोक देशात सुरक्षित असून, लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अद्याप न सावरलेले लोक गुन्हेगारी घटनांना धार्मिक रंग देऊ पाहात आहेत, असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.
विविध क्षेत्रांतील ४९ नामवंत व्यक्तींनी पंतप्रधानांना पत्र लिहून देशातील अल्पसंख्याकांच्या झुंडबळींबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर नक्वी यांनी बुधवारी ही प्रतिक्रिया दिली.
कुणीही गुन्हेगारी घटनांचे धार्मिकीकरण करू नये. दलित व अल्पसंख्याक या देशात सुरक्षित आहेत. जे लोक २०१९च्या लोकसभा निवडणुकांतील पराभवातून अद्याप सावरलेले नाहीत, तेच असे प्रकार करत आहेत, असे पीटीआय या वृत्तसंस्थेशी दूरध्वनीवरून बोलताना नक्वी म्हणाले. २०१४च्या निवडणुकांनंतर ‘पुरस्कार वापसी’च्या नावावर आम्ही हीच गोष्ट पाहिलेली आहे. आताचा केवळ त्याचा भाग दोन आहे, असे हिंसाचार आणि वाढत्या असहिष्णुतेबाबत सरकारच्या कथित मौनाविरुद्ध लेखकांनी नोंदवलेल्या निषेधाच्या संदर्भात नक्वी म्हणाले.