पाकिस्तानमध्ये ‘ISI’ कडून भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा छळ, गाडीचा पाठलाग
भारताने या आठवडयाच्या सुरुवातीला पाकिस्तानी उच्चायोगातील दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने आता इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचा छळ सुरु केला आहे.
गुरुवारी भारतीय अधिकारी गौरव अहलुवालिया यांना घाबरवण्याच्या हेतुने त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला. भारताने ३१ मे रोजी पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर पाकिस्तानने भारताने पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. या सगळयामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आहे.
भारतीय अधिकाऱ्यांचा पाठलाग करुन त्यांच्यावर पाळत ठेवण्याच्या प्रकाराचा भारताने निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानची ही कृती म्हणजे मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. याआधी पाकिस्तानने गौरव अहलुवालिया यांना बोलवून पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा निषेध नोंदवला होता.
भारताने विएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. भारतीय अधिकाऱ्याने बनवलेल्या व्हिडीओमध्ये एका बाईकस्वार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे दिसते तसेच अहलुवालिया यांच्या घराबाहेर एक कार आणि बाईक स्वार उभे आहेत. हा सर्व दबाव टाकण्याच्या रणनितीचा भाग आहे.
नेमकं काय घडलं?
चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं.
अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव असून ते थेट आय़एसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती.