परीक्षा गोंधळाचे सत्र सुरूच
तांत्रिक अडचणीमुळे दिरंगाई
मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षांबरोबरच गोंधळाचे आणि विद्यार्थ्यांच्या वाटेला येणाऱ्या मनस्तापाचेही सत्र सुरू झाले आहे. तांत्रिक अडचणीमुळे विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी जवळपास दोन तास प्रश्नपत्रिका उशिरा मिळाली.
मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. बीए, बीएस्सी, बीएमएम या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका गुरुवारी विद्यार्थ्यांना उशिरा मिळाल्या. या परीक्षा महाविद्यालयाच्या स्तरावर घेण्यात येतात. मात्र त्यासाठीच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पाठवण्यात येतात.
विद्यापीठाचा सव्र्हर डाऊन झाल्यामुळे महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता आल्या नाहीत. महाविद्यालयांच्या प्राचार्यानी विद्यापीठाशी संपर्क साधून याची कल्पना दिली. त्यानंतर तांत्रिक अडचण सोडवण्यात आली. या सगळ्या प्रक्रियेत वेळ गेला. काही केंद्रावर १० ते १५ मिनिटे उशीर झाला. मात्र अनेक केंद्रांवर नियोजित वेळेपेक्षा तास ते दोन तासांनी परीक्षा सुरू झाली. ज्या ठिकाणी परीक्षा उशिरा सुरू झाली तेथील विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला.