परतीच्या पावसामुळे पवना धरण दुसऱ्यांदा भरले शंभर टक्के!
पिंपरी |महाईन्यूज|
परतीच्या मुसळधार पावसामुळे पवना धरण या वर्षी दुसऱ्यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची पुढील वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पण सत्ताधारी भाजप पदाधिकारी व प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा कायम राहणार आहे.
शहरवासीयांची तहान पवना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. मागील तीन दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्या दोन दिवसांत तर ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन यंदाच्या मोसमात पवना धरण दुसऱ्यांदा तुडुंब भरले. ऑगस्टअखेर आणि ऑक्टोबरचा मध्य या काळात धरण शंभर टक्के भरल्याची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग होईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला.
आजमितीला धरणात शंभर टक्के पाणीसाठा असून, तो पुढील वर्षभर पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तीन हजार ९१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर, धरण शंभर टक्के भरले होते. यंदाही तीच परिस्थिती आहे. मात्र, गेल्या ११ महिन्यांपासून चालू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा यापुढील काळातही कायम राहणार आहे. वाढीव पाणी उपलब्ध होईपर्यंत रोज पाणी पुरविणे शक्य होणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरण साठ्याची माहिती
गेल्या २४ तासांतील पाऊस : ९ मिलिमीटर
एक जूनपासूनचा पाऊस : १,७८८ मिलिमीटर
एक जूनपासून पाणीसाठ्यात वाढ : ६४.७१ टक्के
धरणातील आजचा पाणीसाठा : १०० टक्के
गेल्यावर्षी आजचा पाणीसाठा : १०० टक्के