पत्रकार व पोलिसांना जम्बो कोविड सेंटरमध्ये राखीव बेड ठेवा, संभाजी ब्रिगेडची सरकारला मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोविड काळात लोकशाहिचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार आणि पोलिसांसाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये राखीव बेड्स ठेवण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
काळे यांनी हवेली तालुक्याच्या अपर तहसिलदार गीता गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यासाठीचे निवेदन दिले आहे. त्यात काळे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बंधुंचा बळी झालेला नसून तो या व्यवस्थेने घेतलेला आहे, अशी चर्चा जनतेत सुरु आहे. पुण्यामधील पत्रकार पांडुरंग रायकर तसेच कर्जत येथील संतोष पवार यांच्यासारखे तरुण पत्रकार या सरकारी व्यवस्थेचा बळी ठरले आहेत.
रायकर यांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला. त्यांचा मृत्यू उपचारावेळी झालेला नसून उपचार करण्यासाठी बेडच मिळालेला नाही, किंवा तत्काळ आॅक्सिजन मिळाला नाही, म्हणून झालेला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होत असेल याची कल्पना करणे मुश्कील आहे. पत्रकार हे आपल्या जीवावर आणीबाणीच्या परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील प्रत्येक खबरबात जगासमोर घेऊन येत असतात. यामध्ये त्याचं काम हे समाजासाठी एक आदर्श असते. परंतू, तेच पत्रकार शासकीय निष्क्रियेतेचा बळी ठरत असतील तर ते आपल्या महाराष्ट्राला शोभणारं नाही.
पत्रकार कोरोनासारख्या भयंकर महामारीत देखील आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सरकारपर्यंत तसेच प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस प्रशासन तसेच शासकीय कर्मचारी हे देखील स्व:ताचा जीव धोक्यात घालुन आपले काम करत आहेत. अशा लोकांना कोरोनाची लागण झाल्यावर वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यातुन काही कोरोना योध्द्यांचे मृत्यू देखील झालेले आहेत. हे अतिशय गंभीर आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारला विनंती आहे की, अशा सर्व कोरोना योध्यांसाठी काही बेड्स राखीव ठेवण्यात यावेत. त्यांना मोफत उपचार तसेच विना विलंब सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये व तालुका आणि जिल्हास्तरावर काही बेड राखीव ठेउन मोफत उपचार द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे काळे यांनी केली आहे. या निवेदनावर प्रकाश जाधव, जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे, गणेश सरकटे, कृष्णा मोरे यांच्या सह्या आहेत.