पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे | कोरोनाकाळात अत्यंत संयंतपणे वार्तांकन करणारे ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन झाले. रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय वर्तुळातूनही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला”, असे म्हणत अजित पवार यांनी आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “पांडुरंग आपल्यातून जाणं ही निश्चितच आपल्यासाठी धक्कादायक बाब आहे. ही दुर्देवी घटना आहे. त्यांचे गेले ५ महिने ते पुण्यातील कोरोना स्थितीवर बारीक लक्ष होते. त्यांनी खूप काम केले आहे. रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीकरिता पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना सूचनाही दिल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली आहे. “पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत दिली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्यांना विम्याची मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करु”, असे आश्वासन देखील राजेश टोपे यांनी दिले आहे.
“एका पत्रकराचे अशाप्रकारे निधन होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे. पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणे हे दुर्दैवी आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे. पत्रकारांची परिस्थिती अशी असेल तर मग ती योग्य नाही. मी याविषयी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन”, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पूर्व विदर्भात पूर परिस्थितीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.