पतंजलीवर ५ ते ७ हजार कोटींचं कर्ज; बाबा रामदेव म्हणतात…
“कर्ज घेऊन मी भारतमातेप्रती आपलं कर्तव्य बजावत आहे. पतंजलीवर सध्या ५ ते ७ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. आम्ही शून्यापासून सुरूवात केली, परंतु आज मेहनतीच्या आणि देशाच्या भरवशाच्या जोरावर आम्ही पुढे जात आहोत,” असं मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं. तसंच आतापर्यंत तीन बँकांचं कर्ज फेडायचं असल्याचंही ते म्हणाले.
पतंजलीच्या टर्नओव्हरबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, “आतापर्यंत आम्हाला तीन बँकांचं कर्ज फेडायचं आहे. पतंजलीवर ५ ते ७ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. पण पतंजलीचं वार्षिक टर्नओव्हर २३ ते २५ हजार कोटी रूपये आहे. परदेशी कंपन्यांनी जी लोकांची लूट चालवली आहे त्यापासून वाचण्यासाठी आम्ही एका रोल मॉडेलप्रमाणे काम करत आहोत.” एका खासगी वृत्तवाहिनीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. “करोनाच्या संकटकाळात देशातील लोकांना पतंजलीनं १० हजार कोटी रूपयांचा लाभ दिला आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत पतंजली स्वस्त दरात सामानाची विक्री करते,” असंही ते म्हणाले.
“आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन दशकांचा काळ लागला आहे. याच्यापाठी एक कठोर मेहनत आहे. ४० वर्षांपासून आम्ही कोणत्याही पदाशिवाय, वेतनाशिवाय आणि लोभ न बाळगता २४ तास काम केलं आहे. यानंतर पतंजली आजच्या स्थितीवर पोहोचलं आहे. देशात ज्ञान आणि विज्ञानाला एकत्र मिळून पुढे नेलं पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, शोध आणि नाविन्यपूर्ण माहितीला आपल्याला एकत्र जोडायल हवं. आज पतंजलीसोबत ५०० वैज्ञानिक जोडले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर आपल्याला पॅकेजिंग आणि मार्केटिंगवर काम करायला हवं. तसंच सप्लाय चेनपासून डिस्ट्रिब्यूशनपर्यंत सर्वांनी मजबूत विश्वासानं काम करायला हवं,” असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं.
जोखीम पत्करणं आवश्यक
“काही करायचं असेल तर जोखीम पत्करावी लागेल. आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं. आम्ही हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक केली. सुरूवातीला आम्ही ५०० कोटी रूपयांचं कर्ज घेतलं. आज त्याची रक्कम ५ ते ७ हजार कोटी रूपयांवर पोहोचली आहे. परंतु आमचं टर्न ओव्हरही २३ ते २५ हजार कोटी रूपयांच्या दरम्यान असेल. अशाच प्रकारे जोखीम ही पत्करावीच लागते. यासोबतच देशाचांही विश्वास असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण मोठ्या कंपन्यांना मात देऊ शकू,” असं त्यांनी नमूद केलं.
कोरफड लावा
“करोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आपल्या घरात कोरफड लावली पाहिजे. सॅनिटायझरच्या वापरानं हातांना इजा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त लोकांना आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढवावी लागेल, यासाठी त्यांनी काढाही घ्यायला हवं, आपल्याला देशातील करोनामुळे होणारा मृत्यूदर शून्यावर आणायचा आहे,” असंही ते म्हणाले.
मेड इन भारतचं
आम्ही पूर्वीपासून आमच्या उत्पादनांवर मेड इन भारत असंच लिहत असल्याचं बाबा रामदेव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. मी भारत आहे आणि भारतीय हिच आपली ओळख आहे. यासाठी आपल्याला जाती, धर्माच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल, असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं.