पंतप्रधान मोदींना सुडबुध्दी ! गांधी परिवाराचे ‘एसपीजी’ संरक्षण हटविले
- पिंपरी युवक कॉंग्रेसच्या वतीने मोदींच्या कृत्याचा निषेध
- एसपीजी संरक्षण पुन्हा लागू करण्याची केली मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची एसपीजी (SPG) सुरक्षा काढून घेतली. यांचा निषेध करत पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे व सामाजिक चळवळीतील कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डाॅ. वसीम ईनामदार, ज्येष्ठ नेते अशोक काळभोर, उमेश बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, निखिल भोईर, युवुस बागवान, अक्षय उपरे, गौरव हर्णे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गौरव चौधरी, दिपक भंडारी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव, अतुल अडसुळे, फारूख खान, सुभाष वाघमारे, लक्ष्मण म्हेत्रे, विशाल कोळी, सैज्जाद शेख, रहीम चौधरी आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिलेली सुरक्षा या केंद्रातील मोदी सरकारने राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन काढून घेतली. वास्तविक पाहता या परिवारातील माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आतंकवाद्याशी लढा देताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या परिवाराने आपली हयात या देशाकरता घालवली याच परिवारातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर या परिवाराला असलेला जीवाचा धोका ओळखून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी परिवाराला SPG सुरक्षा व्यवस्था दिली होती.
गांधी परिवारासोबत भारताचा इतिहास जोडला गेला
गांधी परिवार हा कोणत्याही एका पक्षाशी संबधित आहे. असे बघणे अपुर्णपणाचे ठरेल.
गांधी परिवारासोबत भारताच्या राजकारणाचा इतिहास जोडला गेलेला आहे. त्यांच्या परिवारातील लोकांवर झालेले जीवघेणे हल्ले व त्यात मृत झालेल्यांची संख्या बघता सरकारने सोनिया गांधी, राहूल गांधी व प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून चुकीचे कृत्य केले आहे. इतर अनेक महत्वाचे विषय असताना सुरक्षा काढून घेणे हे मोदींना प्राधान्यक्रमाचे काम वाटले यातच त्यांचा राजकीय प्रेरीत दृष्टीकोण स्पष्ट होतो, असे एड. असीम सरोदे यावेळी म्हणाले.