पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात
गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरुये. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या सावटाखाली आलाय.तसेच पावसाच्या वाढच्या जोरामुऴे पंचगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात झालीये.
जिल्ह्यातील 9 राज्य आणि 26 जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत. कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-राधानगरी, आंबोली-आजरा, गगनबावडा-जंगमवाडी या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद झालीये.
पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 6 इंचावर गेल्याने कोल्हापूरवासियांची धाकधूक वाढत चालली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. पंचगंगा नदीचं पाणी प्रमुख रस्त्यांवर यायला सुरुवात झाली आहे. शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरु महामार्गाचा सर्व्हिस रोड पोलिसांनी बंद केला. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे.
कोल्हापूर शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. पावसाचा जोर काहीसा कमी आला असला, तरी धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका मात्र कायम आहे.
पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
तर, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 84.44 टक्के भरलं. वारणा धरण परिसरात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मात्र सकाळी कृष्णा नदीची पाणी पातळी 5 इंचाने कमी झाली. सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फूट 7 इंच इतकी झाली आहे.
खबरदारी म्हणून सांगली जिल्हा परीषदेच्या 15 यांत्रिक बोटी कृष्णा नदी पात्रात दाखल झाल्या. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या बोटी नदी काठच्या गावांना दिल्या जाणार. त्याआधी नदी पात्रात या बोटींची प्रात्याक्षिके घेतली जाणार आहेत.