नेवासे तालुक्यातून टरबुज भरलेले तब्बल 100 ट्रक काश्मीरमधील श्रीनगरकडे रवाना
नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांनी टरबुज भरलेले तब्बल शंभर ट्रक काश्मीरमधील श्रीनगरकडे रवाना केले आहेत. दरम्यान, येथे टरबुजांची दरवर्षी आठ ते दहा कोटींची उलाढाल होत असते मात्र यावर्षी जेमतेम चार कोटींपर्यंतच ही उलाढाल होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
करोनामुळे देशातील आर्थिक परिस्थिती ढासळल्यानंतर केंद्राने व राज्याने शेतकऱ्यांच्या शेती कामाला प्राधान्य देण्यासाठी लॉकडाऊनमधून शिथीलता दिली. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतीच्या कामाला आणि वाहतुकीला परवानगी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे थोडाफार दिलासा तसेच उत्पन्न खर्च पूर्ण तर नाही मात्र थोडा तरी वसूल होईल अशी आशा आहे.
नेवासे तालुक्यात टरबूज व खरबूज या पिकांना शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे. यावर्षी तालुक्यात टरबूज वाड्या केल्या अन भरपूर उत्पन्न वाढले. मात्र करोनामुळे अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. वेळेत माल ग्राहकांपर्यंत गेला नाही. शहरातील बाजार समित्या बंद तसेच मुंबई, वाशी व पुणे मार्केटही बंद होते त्यामुळे अनेक टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
दरम्यान, श्रीनगरला १८ ते २० रुपये किलो टरबूज विकले जाते. सध्या नेवासे येथे शेतकऱ्यांकडून व्यापारी सहा रुपये किलो दराने टरबूज घेतात. ट्रक येथून श्रीनगर येथे पोहचायला सहा दिवस लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल (टरबूज) हे चांगल्या प्रतीचे आहेत का हे पाहूनच व्यवहार होतो. छोट्या आकाराची फळे घेतली जात नाहीत. शुगर किंग व मॅक्स या टरबुजाच्या जातीला चांगली मागणी आहे. मॅक्स जातीचे टरबूज हे वाहतुकीसाठी चांगले असते कारण त्याचे आवरण कडक असल्याने टरबूज खराब होण्याचे प्रमाण कमी असते.