नेपाळ जलविद्युत प्रकल्पातील चौघे 40 तासांनी सुखरूप बाहेर
काठमांडू – नेपाळच्या “अरुण 3′ या जलविद्युत प्रकल्पातील मोठ्या बोगद्यामध्ये अडकलेल्या चौघा कामगारांना तब्बल 40 तासांनी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या चौघा कामगारांमध्ये दोघेजण भारतीय आहेत. नेपाळमधील तुमलिंगतार भागात 900 मेगावॅट क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचा शीलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी गेल्या महिन्यात संयुक्तपणे केला होता. भारताच्या मदतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान जलवाहतुकीसाठीच्या प्रचंड बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल आणि माती घसरली होती. त्यामध्ये चार कामगार बोगद्यामध्ये वाहून गेले होते. या कामगारांच्याबरोबर माती उपसण्याचे डोझीयर यंत्रही बोगद्यात वाहून गेले होते. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. तब्बल 39 तास भुयार खणल्यावर या चार कामगारांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.