निलेश राणेंकडून अजित पवारांच कौतुक तर मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रातील पुणे, रायगड अशा काही जिल्ह्यातील गावांमध्ये अगदी हैदोस घातला होता. त्यामुळे वित्त हानी खूप झाली. लोकांनी आपली घरे गमावली. या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज (५ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज त्यांनी रायगड जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली. आणि त्यानंतर तात्काळ त्यांनी १०० कोटींची मदत रायगड जिल्ह्याला जाहीर केली. पंचनामे करण्यास वेळ जाईल मात्र मदत मिळणे आणि ती देखील तातडीने हे गरजेचे आहे असेही म्हणणे मुख्यमंत्र्यांचे होते.
मात्र, त्यांच्या या मदतीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पण रायगडमध्ये फक्त १/२ ठिकाणी पाहणी करून परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीत सुद्धा अनेक गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर, अशा शब्दांत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.तर दुसरीकडे त्यांनी उपमुख्मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. जसं पुण्यात अजित दादांनी केलं त्याला म्हणतात परिस्थिती आणि प्रशासन हाताळणं. नाहीतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री. रत्नागिरीचा पालकमंत्री दिसत नाही आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री कधी कधी दिसतो पण काही कामाचा नाही. असं म्हणत त्यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना टोला लगावला आहे.