निझामुद्दीनमध्ये लोकांनी एकत्रित येणे एक तालिबानी गुन्हा – मुख्तार अब्बास नकवी
नवी दिल्ली | केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी तब्लीगी जमातच्या निझामुद्दीन येथील एकत्रित येण्याच्या घटनेची तालिबानशी तुलना केली आहे. देशभर लॉकडाउन असतानाही निझामुद्दीनमध्ये तब्लीगी जमातचे हजारो लोक एकत्रित आले होते. हा एक तालिबानी गुन्हा आहे. हा गुन्हा माफ करता येणार नाही असे केंद्रीय मंत्री नकवी म्हणाले आहेत.
या लोकांनी अनेकांचे जीव धोक्यात टाकले आहे. सरकारच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या अशा संस्थांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी असेही ते पुढे म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नकवी पुढे बोलताना म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरोधात आव्हानांना सामोरे जात आहे. तर दुसरीकडे, लॉकडाउन असतानाही तब्लीगी जमातचे लोक एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित येतात. हा एक गंभीर गुन्हा आहे. मुद्दाम केलेला हा गुन्हा माफ करताच येणार नाही.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, “तब्लीगी जमातचा तालिबानी गुन्हा.. हा एक गंभीर गुन्हा आणि हलगर्जीपणा आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. अशा स्वरुपाचा गंभीर गुन्हा माफ करताच येणार नाही. दरम्यान, तब्लीगी जमातच्या निझामुद्दीन येथील जोडमधून परतलेले सदस्य देशाच्या विविध राज्यात आले आहेत. त्या-त्या राज्यातील प्रशासन अशा सदस्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करत चाचणीची व्यवस्था करत आहे. याच जमातमधून आलेले काही लोक पुणे आणि पिंपरी चिंचवडसह औरंगाबादमध्ये सुद्धा असल्याचे सांगितले जात आहे. त्या सर्वांचा शोध घेऊन प्रशासनाने त्यांना टॅग केले आहे.