‘नाट्यगृहे सुरू करा’, जागतिक मराठी नाट्यधर्मी संघाची मागणी
मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे ३ लाखांहून अधिक रंगमंच कलाकारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. राज्यात पुनश्च हरिओम सुरू झाल्याने राज्यातील नाट्यगृहेही सुरू करा, अशी मागणी नुकत्याच स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने केली आहे. याबाबतीत त्यांनी राज्याचे सांस्कृतिक सचिवांना निवेदनही सादर केले आहे. तसेच, हे निवदेन लवकरच मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष भेटीत देण्यात येणार आहे असे जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर, उपाध्यक्ष महेश मांजरेकर व कार्यवाह दिलीप जाधव तसेच निर्माते प्रशांत दामले, सुनील बर्वे, राकेश सारंग यांनी सांगितले.
राज्याची आर्थिक घडी सावरण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. तसेच, चित्रिकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाट्यगृहेही सुरू करा अशी मागणी करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आरोग्याबाबत आखून दिलेले सर्व नियम पाळून नाट्यगृहात प्रयोग केले जातील असे आश्वासन या संस्थेकडून देण्यात आले आहे.
या निवेदनात खालील मुद्द्यांचा विचार करून राज्यातील नाटयगृहे सुरु करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
- रंगमंच कामगारांना प्रयोगापूर्वी सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
- प्रत्येक नाटयगृहांमध्ये नाटकाचे रोज दोनच प्रयोग होतील.
- प्रत्येक कलाकाराचे मेकअप किटही वेगळं असेल.
- नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था ही शासकीय नियमांना गृहीत धरूनच करण्यात येईल.
- नाटकाच्या मध्यंतरात व नाटक संपल्यावर पोर्चमध्ये तसेच स्वच्छतागृहामध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना नाटकाचा प्रयोग सुरु होण्याआधी करण्यात येईल.
- नाटकाच्या प्रयोगाची तिकीटविक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.
- रसिक प्रेक्षकांनी नाट्यप्रयोग सुरु होण्याअगोदर व प्रयोगानंतर कलाकारांना भेटायला येऊ नये अशी विनंती करण्यात येईल व गर्दी टाळण्यासाठी त्याचे गंभीरतेने पालनही करण्यात येईल.