नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे गांधींच्या नव्हे तर जिनांच्या विचारांचा विजय– शशी थरूर
महाईन्यूज | दिल्ली
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे महात्मा गांधींच्या नव्हे, तर पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिनांच्या विचारांचा विजय होणार आहे, अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. दरम्यान हे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे.
थरूर म्हणाले की, केवळ धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात असून त्यामुळे भारत हा पाकिस्तानचेच हिंदुत्ववादी रूप बनून राहील. ‘भाजप सरकार एका समुदायाला वेगळे काढत आहे व त्यांना इतर समुदायांप्रमाणे नागरिकत्व देण्यास तयार नाही. हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले तरी सर्वोच्च न्यायालय तरी देशातील राज्यघटनेतील मूलतत्त्वांचे उल्लंघन सर्वोच्च न्यायालय होऊ देणार नाही अशी आशा आहे.
राष्ट्रीय आश्रय धोरणावर सरकारने कुठलीही चर्चा केलेली नाही. त्याबाबत मी खासगी सदस्य विधेयकही मांडलेले होते. आता सरकार शरणार्थीना नागरिकत्व देण्यास निघाले आहे. वास्तविक पातळीवर शरणार्थीची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आवश्यक पावले उचलण्यास सरकारची तयारी नाहीये. त्यातून हा केवळ राजकीय फार्स आहे हेच दिसून येते. यातून भारतातील मुस्लिमांचे अधिकारच जाणार असून आपल्या संस्कृतीची जी अभिमानास्पद वैशिष्टय़े आहेत त्यालाच हरताळ फासला जाणार आहे.