नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या घटना वाढतील – आमदार राज पुरोहित
मुंबई | महाईन्यूज
मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होईल तसेच निर्भयासारख्या शेकडो घटना घडतील, असे मत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारसमोर ठेवला होता, त्याला मंजुरीही देण्यात आलेली आहे. मात्र, याला भाजपाने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला असून त्यातच पुरोहित यांनी हे विधान केलेल आहे.
पुरोहित म्हणतात, “मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. जर मद्यपानाची ही संस्कृती प्रसिद्ध पावली तर मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल आणि शेकडो निर्भयासारख्या घटनाही घडतील. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ही संस्कृती भारतासाठी योग्य आहे का? याचा विचार नक्कीच करावा.”
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वाव नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. त्यांनी ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यानुसार आता या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हणता येईल. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात.