नवाज शरीफ यांच्या वक्तव्याने पाकिस्तानात भूकंप – तातडीची बैठक बोलावली
इस्लामाबाद- नवाज शरीफ यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. त्या संदर्भात पाकिस्तानी लष्कराची उद्या तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची जाहीर कबुली शरीफ यांनी दिली आहे.या संदर्भात पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावण्याची सूचना केली आहे.
शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना विरोधी पक्षाबरोबरच त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या सदस्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
मात्र नवाझ शरीफ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा त्यांचे बंधू शाहबाज खान यांनी केला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य नवाज शरीफ करतील यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबद्दल नवाझ शरीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी एका व्यक्तीने चकवाल जिल्हा पोलीसांशी संपर्क साधला असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.