नगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी
मुंबई : ‘ऑगस्टा’वरून काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्येच पाठराखण केली असताना, नगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याच्या कृतीबद्दल काँग्रेसने नापसंती व्यक्त करीत ही कृती उचित नव्हती, अशी टीका केली आहे.
भाजपच्या विरोधात राज्यात महाआघाडी आकारास येत असताना एका घटक पक्षाने भाजपला मदत करण्याची कृती योग्य नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. कोणाला मदत करायची, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असला तरी नगरमध्ये जे झाले ते योग्य नव्हते. नगरबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला असला तरी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या अशा घटनांमुळे वेगळा संदेश जातो, असेही चव्हाण यांनी सांगितले.
सोनियांची पाठराखण!
ऑगस्टावरून मिशेलच्या कबुलीजबावाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची पाठराखण केली. नगरमध्ये दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. यावरून राष्ट्रवादीवर टीका सुरू झाली होती. नगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादीचे नेते करीत असले तरी हा निर्णय आधीच झाल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर गांधी कुटुंबीयाची पाठराखण करण्याकरिता पवारांनी नगरचीच निवड केल्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नगरमध्येच पवार मोदी यांच्या विरोधात आणि गांधी यांच्या बाजूने का बोलले, असा सवालही केला जातो. गेल्याच आठवडय़ात कराडमध्येही पवार यांनी गांधी कुटुंबीयाचे समर्थन केले होते.