धनकवडीतील विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात मिळविले 35 गुण
पुणे – दहावी- बारावीचा निकाल लागला की चर्चा होतात कुणाला किती मार्क पडले त्याची. १०० टक्के गुण मिळवणारेही विद्यार्थीही हल्ली पाहायला मिळतात.पण चर्चेत राहायला फक्त शंभरला शंभरच पाहिजे असे कोणी सांगितले. धनकवडी मधील या शिलेदाराने सर्वच विषयांत ३५ गुण मिळवित जो काही पराक्रम केला.. तो निक्कीच वेगळा आहे. पण त्याने जे काही मनापासून आणि जिद्दीने कष्ट केले त्याचे हे सार्थक.. ह्या अभिनव यशाने त्याच्या चेहऱ्यावर झळकला लढाई जिंकल्याचा आनंद…आणि यशाचं समाधान..!
भावा.. जिंकलंस.. मैदान राखलंस..! धनकवडी मधील श्रवण राजेश साळुंके असे या विद्यार्थ्यांचे नाव.. त्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत ३५ गुण मिळाले आहेत. श्रवण हा पुण्यातील नाना पेठमध्ये राहतो. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने तो आपल्या मामाकडे धनकवडीत आला होता. मागील वर्षी ९ वीमध्ये नापास झाल्यानंतर श्रवणने धनकवडी परिसरातील रोहन माध्यमिक विद्यालयात दहावीसाठी प्रवेश घेतला होता.
सर्वच विषयात १०० गुण मिळवणे जितकं अवघड तितकंच काहीसे सर्व विषयात ३५ गुण मिळवणे अवघड आहे. मात्र धनकवडी मधील या पाठ्यने हे अवघड दिव्य पार केलंय. आणि त्याच्या या ‘अवघड’ कामगिरीचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.