धक्कादायक! ट्रकचा भीषण अपघातात पाच कामगार जागीच ठार, ११ जण गंभीर जखमी
औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणखी एका घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात पाच कामगार जागीच ठार झाले, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ ही घटना घडली.
लॉकडाउनमुळे प्रवासाच्या सुविधा बंद आहेत. विशेषतः राज्यांबरोबरच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक मजूर पायीच घरी जात आहेत. अशाच प्रकारे घरी जात असताना जालना-औरंगाबाद दरम्यान रेल्वे मार्गावर १६ जणांना रेल्वेनं चिरडलं होतं. या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच आणखी एका अपघातात ५ मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळ असलेल्या पाथा गावानजिक एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघातात झाला. आंब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये १८ मजूर होते. हा ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता. दरम्यान, पाथाजवळ ट्रक उलटला. यात पाच मजूर जागीच ठार झाले. ११ मजूर गंभीर झाले आहेत. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.