धक्कादायक! अहमदनगरमध्ये चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जालन्यात पाच मुली तलावात बुडाल्या
अहमदनगर: अहमदनगरमधील बाबूर्डी गावात चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालेला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी गावात चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी येथे एक गुऱ्हाळवर उत्तरप्रदेश मधील मजूर आले होते. हे मजूर झोपलेले असताना चार भावंडे बाबूर्डीतील शेततळ्यात गेले होते.
मात्र पाण्यात उतरल्यानंतर त्यांना परत वर येता आले नाही. त्यामुळे या चारही भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. महंमद अरबाज (21), महंमद फैजल (20), महंमद दानिश (13) आणि महंमद नावजीस (9) अशी या चार मुलांची नावे आहेत. दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र एकाच कुटुंबातील 4 भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.