दोन दिवसांत होणार खातेवाटप, कोणीही नाराज नाही – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई |महाईन्यूज।
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिलीच राज्य मंत्रीमडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी येत्या एकदोन दिवसांत खातेवाटप होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नवीन सहकारी आले त्यांना शुभेच्छा दिल्या. खातेवाटप पक्षाप्रमाणे झालेलं आहे. उद्या परवा पर्यंत खाते वाटप पूर्ण होईल असं ठाकरे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीबाबत विरोधकांकडून सरकारवर टिका होत आहे. याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ज्यांना काम नाही ते हे उद्योग करत आहे. “आम्ही दीड लाखाची मर्यादा वाढवली आहे. ती दोन लाख केली तसेच आम्ही अटी शर्ती ठेवल्या नाही. शेतकरी कर्जमाफीवरून उगाच सरकारला बदनाम करण्याचं काही लोक काम करत आहे. कारण त्यांना काही काम उरलेले नाही.”
शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत विचारले असता, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळात घराणेशाहीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, त्यावर बोलताना ‘आम्ही जे करतो ते रोखठोकपणाने आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला.