देशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण
- भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ लाखांच्या पुढे
नवी दिल्ली – शेकडो देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा भारतातील प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. भारताची रुग्ण संख्या आता ५० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ९२ हजार ७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार १३६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ लाख ४६ हजार ४२८ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ७९ हजार ७२२ इतका झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जगभरात कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतात दररोज ७५ ते ९५ हजारांच्या घरात आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वांचीच चिंता प्रचंड वाढली आहे. नियमांमध्ये शिथिलता आली असली तरी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन कायम आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण कोरोनावरील लशीकडे डोळे लावून बसला आहे.