देशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार – संजय राऊत
नवी दिल्ली : लोकशाहीची हत्या झाल्याची टीका केली जात आहे. पण देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी रात्री भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर आज सकाळी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस ऐवजी भाजपाला निमंत्रण दिल्याने या निर्णयावर देशभरातून टीका होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले, येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.