देशात कोरोनाचे थैमान सुरूच; २४ तासांत ३२५ मृत्यू, ११,५०२ नवे रुग्ण
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत असला, तरी कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ११ हजार ५०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग पाचव्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारत आता कोरोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ७९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक लाख ५३ हजार १०६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत ९ हजार ५२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
लॉकडाउननंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढायला लागली आहे. त्यात देशातील काही भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावाही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. सरकारनं ही बाब स्वीकारली, तर लोक अधिक सावध होतील व काळजी घेतील, अशी सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.
वास, चव नष्ट होणे ही नवी लक्षणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला करोनाची बाधा झालेली असू शकते. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी कोरोनाची लक्षणे मानली जातात.