‘देशभक्तीच्या नावाखाली लोकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष’; शरद पवार सरकारवर बरसले
‘देशाच्या समोरचे महत्वाचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही. निव्वळ ३७० कलम, काश्मीरमध्ये काय काय केले, पुलवामा सांगतात. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन भावनेला हात घालत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. इस्लामपूरमधील वाळवा मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.
‘अतिरेकी कारवायांचा खात्मा करा. आमचा पाठिंबा आहे. जगात सुंदर काश्मीर आहे. गुलामनबी आझाद यांनी आज निवेदन दिल्याचे सांगतानाच काश्मीरमध्ये शांतता आहे, परंतु ती स्मशानशांतता आहे. दुकाने, व्यापार बंद आहेत. घरं कशी चालवायची ही चिंता तिथल्या लोकांना सतावत आहे. रस्त्यावर कोण फिरणार नाही हे बघणं म्हणजे आम्ही खूप काही कर्तृत्व केलं हे सांगणं योग्य नाही’ असा टोलाही लगावला.