कसोटीत स्थिरावण्यासाठी रोहितला पुरेसा वेळ दिला जाईल – विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीच्या जागेसाठी रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी देण्यात आलेली आहे. पहिल्या कसोटीआधी ३ दिवसीय सराव सामन्यात रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला होता. त्यामुळे कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करुन दाखवण्याचं दडपण त्याच्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, रोहितला स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
“जर रोहितने त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत आम्हाला सुरुवात करुन दिली तर आमची फलंदाजी अधिक मजबूत होईल. सध्या आम्ही त्याच्यावर कोणतंही दडपण टाकणार नाहीयोत. भारतात आणि परदेशात कसोटी सामने खेळताना विविध गोष्टींचा विचार करावा लागतो. सलामीवीराला तुम्हाला पुरेसा वेळ आणि खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कसोटीमध्ये स्थिरावण्यासाठी आम्ही त्याला पुरेसा वेळ देणार आहेत.” विराट कोहलीने पत्रकारांशी बोलत असताना स्पष्ट केलं.