देवेंद्र फडणवीस यांचा दावा : जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये भाजपची कामगिरी उत्साहवर्धक!
गत निवडणुकीत ५३ जागा होत्या त्या आता १०३ झाल्या आहेत : फडणवीस
मुंबई | महाईन्यूज| प्रतिनिधी
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेने साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक आमदार निवडून आले असतानाही विरोधी बाकावर बसावे लागले. सत्ता स्थापनेचे स्वप्न भांगाल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक धक्का बसला आहे.राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत महा विकास आघाडीने अर्थात शिवसेना- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.
नुकतेच हाती आलेल्या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अवघी एक म्हणजे धुळे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवता आली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत भाजपने उत्साहवर्धक कामगिरी केल्याचा दावा केला आहे.
राज्यातील नागपूर, वाशीम, अकोला, धुळे, नंदूरबार आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांचे निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहेत. या ६ जिल्हा परिषदांमध्ये गेल्या निवडणुकीत ५३ जागा भाजपाला होत्या, त्या आता १०३ झाल्या आहेत. जवळजवळ दुप्पट अशी ही वाढ आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात जिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ जागांपैकी १०३ जागा जिंकून भाजपा हा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस १४८ वरून ११८ जागांवर खाली आली आहे.
नंदूरबार आणि धुळ्याचे निकाल तर विशेष उल्लेखनीय आहेत. धुळ्यात भाजपाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आणि नंदूरबारमध्ये १ वरून २३ जागांवर झेप घेतली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
****
जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजप कमांक एकचा पक्ष!
निवडणूक आयोगाकडून आताच प्राप्त आकडेवारीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा हा 106 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तसेच, पंचायत समिती निकालांमध्ये सुद्धा भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
पंचायत समितीची आकडेवारी
एकूण जागा: ६६४
भाजपा: १९४
काँग्रेस: १४५
राष्ट्रवादी काँग्रेस: ८०
शिवसेना: ११७
अन्य: १२८
असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.