दिल्लीत कोणाचेही सरकार असो ‘पवार’ यांना वेगळा मान- सुप्रिया सुळे
- अवघा महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी उभा पैठण– खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पैठण तालुक्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राफेल डील वरून केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या “शरद पवार यांना महाराष्ट्राने ५० वर्षे प्रेम दिले आहे. एका चॅनलने चुकीचा इंटरव्ह्यू प्रसिद्ध केला म्हणून गैरसमज करून घेऊ नका. चॅनलने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. दिल्लीत कोणाचेही सरकार असो पवार यांना वेगळा मान आहे. अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभे आहे म्हणून हे शक्य झालं, असे त्या म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शिवसेनेची परिस्थिती म्हणजे एक हात मे दो लड्डू, असे त्या म्हणाल्या. सरकारवर टीकाही करतात आणि सत्तेत ही राहतात. हे सरकारला फक्त धमकी देतात की सत्ता सोडून जाऊ. आता भाजपलाही सवय झाली आहे. तेही काही प्रतिक्रिया देत नाही. त्यांनाही माहिती आहे हे कुठे जात नाही, असा चिमटा सुळे यांनी काढला. या बैठकीस माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश उपाध्यक्ष कादिर मौलाना आणि व्यापारी मित्र उपस्थित होते.