दिलीप कुमारांना धमकावणाऱ्या बिल्डरची सुटका, सायरा बानोंची मदतीसाठी पंतप्रधानांकडे धाव
ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. बिल्डर समीर भोजवानीकडून येणाऱ्या धमक्यांना कंटाळून काही महिन्यांपूर्वी सायरा बानोंनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. परंतु समीर भोजवानीची पोलीस कोठडीतून सुटका झाली आहे त्यामुळे, त्याच्यापासून असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन सायरा बानो यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे.
‘भू माफिया समीर भोजवानीची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तरीही कोणतीही कारवाई भोजवानीविरोधात करण्यात आलेली नाही. पैसे आणि बळाचा वापर करत पद्मविभूषीत व्यक्तीला धमकावलं जातं आहे आणि यासाठी मला तुमची मुंबईत भेट घ्यायची आहे.’ असं ट्विट सायरा बानो यांनी करत मोदींकडे मदत मागितली आहे .
डिसेंबर २०१७ मध्ये सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली होती. वांद्र्यांच्या पाली हिल भागातील दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले तसेच यासंबधी सायरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलं होतं. समीर भोजवानी याने काही खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच तो दिलीप कुमार यांना धमकावत आहे. शिवाय समीरची राजकीय वर्तुळातही फार ओळख असल्याने तो आम्हाला सतत धमकावत असल्याचे सायरा यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर समीर भोजवानीला अटकही झाली होती. आता त्याची जामीनावर सुटका झाल्यानं सायरा बानो यांनी थेट मदतीसाठी पंतप्रधानांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणात पंतप्रधान मोदी लक्ष घालतील आणि आपल्याला मदत करतील एवढी अपेक्षा सायरा बानो यांनी केली आहे.