दारूच्या दुकानांसमोर होत असलेल्या गर्दीला रोखण पोलिसांसमोर नवं आव्हान
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारनं अपवाद वगळता दारूची दुकानं उघडी करण्यास परवानगी दिल्यानं मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या आनंदाच्या भरात अनेक ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा सर्वांनाच विसर पडला आहे… मद्यप्रेमी दारूच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळं या गर्दीला कसं रोखायचं हे पोलिसांपुढं नवं आव्हान उभं राहिलं असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे.
मुंबई, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांत दारू विकत घेण्यासाठी सकाळपासूनच वाइन शॉप्ससमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. दारूची दुकाने दहा, अकरा वाजेनंतर सुरू होत असली तरी अनेक जण सकाळी आठ वाजल्यापासूनच तळ ठोकून होते. नगरमध्ये काही दुकानदारांनी ‘सुरक्षित अंतरा’च्या नियमाचे पालन व्हावे म्हणून स्वत:च दुकानांसमोर चौकोन आखून दिले होते. काही लोक त्या चौकोनात उभे राहत होते, मात्र अनेक जण पिशव्या नंबरवर ठेवून सावलीची जागा पकडत होते.
नगरमधील केडगाव येथेही सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून बॅरिकेड लावत लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले… तरीही बॅरिकेट बाहेर शेकडो लोक रांगा लावण्यासाठी गर्दी करून होते. नगर शहरातील पाइपलाइन भागातील दारू दुकानासमोर लांबलचक रांग लागलेली होती.मुंबईतील दहिसर चेकनाका परिसरात पहाटेपासून मद्यप्रेमींच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.